कार्तिक यात्रेत यावर्षी प्रथमच पत्राशेड येथे मंदिर समिती मार" />
पंढरपूर प्रतिनिधी :-
दर्शन रांगेतील कोणताही भाविक उपाशी पोटी विठुरायाच्या दर्शनास जाऊ नये, यासाठी मंदिर समिती मार्फत पत्राशेड येथे दिनांक २१ ते २४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके यांनी दिली.
त्याचा शुभारंभ आज दि.२१/११/२०२३ रोजी मा. श्री. कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर तसेच मा.सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, श्री.संभाजी शिंदे, ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके व व्यवस्थापक श्री.बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. या अन्नछत्राची जबाबदारी विभाग प्रमुख श्री. बलभीम पावले व सहायक विभाग प्रमुख श्री. दत्तात्रेय इंगळे यांना देण्यात आली असून, प्रसाद वाटपासाठी श्री. संत मिराजी महाराज पुरूष व महिला सेवेधारी मंडळ, अकोला या स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येत आहे.
कार्तिकी यात्रेसाठी पंढरीत दाखल झालेल्या भाविकांनी सध्या विठुरायाच्या दर्शनरांगेत मोठी गर्दी केली आहे. दर्शन रांगेत हजारो भाविक उभे आहेत, ही दर्शनरांग गोपाळपूर पर्यंत करण्यात आली असून, यंदा रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी दर ५० मीटर अंतरावर पर्यवेक्षक नियुक्ती केल्याने दर्शन रांग जलद व द्रुतगतीने चालून भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होत असून, दैनंदिन सुमारे ३० हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन घडत आहे. संपूर्ण दर्शन रांगेवर ऊन, वारा, पावसापासून संरक्षणासाठी आच्छादन, पिण्यास मिनरल वॉटर -चहा, स्पिकरवर अभंग आणि भक्तीगीते, दर्शन रांगेतून स्वच्छतागृहात जाणाऱ्यांना पास, सतर्क सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्थापन, पायाला खडे टोचू नये म्हणून म्याटिंग, कुलर - फॅन, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, लाईव्ह दर्शन, सूचना फलक, सॅनिटरी नॅपकिन, आपत्कालिन मदत कक्ष व आरोग्य सुविधा उपलब्ध असून पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल.. या जयघोषांनी दर्शनरांग दणाणून गेली आहे.