दिवाळीत लालपरी सुसाट धावली ; महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर " />
सांगोला प्रतिनिधी
ग्रामीण भागाची लालपरी असलेल्या एसटी बसेस दिवाळीत सुसाट धावल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे.
दिवाळी सण आपल्या माणसांमध्ये साजरा करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्रवाशांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सांगोला आगाराची एसटी पुणे, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यात धावली. विशेषतः बहीण-भावांना भाऊबिजेदिवशी एसटीने एकत्र आणले. त्यामुळे सांगोला आगारातून एसटीला दिवाळीत १ कोटी ५५ लाख १३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य राज्य परिवहन मार्ग महामंडळ अर्थात एसटी महामंडळाचे चालक, वाहक खरोखरच सार्थ ठरवीत आहेत. कोरोना कालावधीनंतर कर्मचारी पगार, निधी, बसची दुरुस्ती देखभाल आदींच्या खर्चामुळे शासन बंद करते की काय, असा प्रश्न उभा राहिला होता. यादरम्यान अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. मात्र, सरकारला दरमहा पगारासाठी कोट्यवधी रुपये महामंडळाला द्यावे लागत होते. सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाने खास महिलांकरिता तिकीट दरात ५० टक्के सवलत जाहीर केली. दिवाळीची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळ दरवर्षी नियमित एसटी बसेसशिवाय अतिरिक्त एसटी बसेस चालविण्याचे नियोजन केले होते. सांगोला आगारातून दिवाळीत ५६ एसटी बसेसनी २ लाख ८९ हजार किमीचा प्रवास केला. यातून सांगोला आगाराला १ कोटी ५५ लाख १३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
यंदाही एसटी महामंडळाकडून राज्यभरात अतिरिक्त बस गाड्या चालविण्यात आल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. त्यानंतर दिवाळी सुट्यांच्या कालावधीत प्रवाशांना सातत्याने बससेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एसटीच्या बस अगदी हाऊसफुल अशा ओसंडून वाहू लागल्या आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सेवाच मोफत करण्यात आली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून दिवसेंदिवस उत्पन्न वाढू लागले आहे. सांगोला बसस्थानकात दिवाळी सुटीनिमित्त आलेल्या प्रवाशांची परतीसाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात फिरा कोणाला काही देणे-घेणे नसते. मात्र सणाला गावी यायलाच हवं. सर्व मुलं, सुना, नातवंडांनी एकत्र येऊन सण साजरा करावा, असा कुटुंबातील ज्येष्ठांचा आग्रह असतो. त्यामागे एकमेकांचे सुख-दुःख वाटून घ्यावेत, अशी धारणा असते. त्यामुळे लाखो नागरिक दिवाळीला आपापल्या गावी येतात.