सांगोला प्रतिनिधी
सांगोला येथे कवयित्री डॉ. वैशाली हसबे - काशिद यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा एस टी स्टँड पाठीमागे एम जी एम हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे तर अध्यक्षस्थानी डॉ. सयाजीराजे मोकाशी उपस्थित होते. या सोहळ्यात मा.आ.दिपक आबा साळुंखे पाटील, भाजपा जेष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड, लेखिका मेघा पाटील,कवयित्री पुष्पलता मिसाळ, कवी लेखक इंद्रजित घुले सर यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या स्वागताने झाली. प्रमुख पाहुण्या नीलम माणगावे यांनी आपल्या भाषणात पुस्तकातील 'अर्पण पत्रिका' आणि 'मुख पृष्ठ' यावर सखोल भाष्य केले. पुस्तकातील संकल्पना आणि त्यामागील विचारांचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, जरी पुस्तकात 'पदराचे पंख' नावाची कोणतीही स्वतंत्र कविता नसली, तरीही त्या कवितेचा मूळ गाभा आणि भावना पुस्तकातील सर्वच पानांवर आणि लिखाणात स्पष्टपणे उतरल्या आहेत. पुढे बोलताना त्यांनी कवयित्रींनी केवळ कवितेपुरते मर्यादित न राहता कथा, ललितसारख्या विविध प्रकारच्या लेखनातही स्वतःचे योगदान दिले पाहिजे, असा महत्त्वाचा सल्ला दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी एका दर्जेदार साहित्यिक कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सांगोला शहरात तब्बल १९ महिला लिहित्या आहेत, ही अत्यंत भूषणावह गोष्ट असल्याचे नमूद करत त्यांनी मिश्किलपणे 'महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात लिहित असताना पुरुष वर्ग नक्की काय करतोय?' असा सवाल उपस्थित केला. आजच्या काळात साहित्य क्षेत्रात महिलांचा मोठा दबदबा निर्माण झाला असून, स्त्रिया आपली प्रगल्भ मते मांडत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुस्तकाच्या 'अर्पण पत्रिके'चे विशेष कौतुक केले, तसेच पुस्तकाचे शीर्षक हे कवयित्रीच्या कल्पकतेची आणि सर्जनशीलतेची उत्तम पावती असल्याचे स्पष्ट केले.
प्रारंभी सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी सांगोल्यातील महिला साहित्य क्षेत्रात पुढे येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.. त्याच प्रमाणे माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान सांगोला अध्यक्षा डॉ संजीवनी केळकर , लेखिका मेघा पाटील कवयित्री पुष्पलता मिसाळ , भाजप नेते शिवाजीराव गायकवाड, कवी इंद्रजित घुले सर यांनी काशिद यांच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा दिल्या..
. सूत्र संचालन शोभा महांकाळ तर प्रास्ताविक डॉ विजय काशिद यांनी केले..
या कार्यक्रमाला परिसरातील अनेक लेखक, कवी, साहित्यप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.