सांगोला - 'मराठा आरक्षण' हा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहत नसेल तर समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढत राहावे, परंतु कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. या समाजाच्या लढ्यासोबत शेतकरी कामगार पक्ष सोबत राहील अशी ग्वाही शेकापचे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. मनोज जरांगे यांच्याशी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी चर्चा करून तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांस मार्गदर्शनही केले.
यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, पाठीमागे काही दिवसांपूर्वी लाठीचार्जची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे. मराठा आरक्षण हा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा असून त्याकरिता कितीही मोठा लढा द्यावा लागला तर समाजबांधव तो देईल.
सरकारने या विषयाकडे गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आहे. माझी मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका मात्र घेऊ नये.
हे शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहत नसेल तर आपण लढा देऊ परंतु स्वतःच्या जीविताची काळजी घेतली पाहिजे. आपणास न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप पक्ष आपल्या सोबत आसेल.
यावेळी सांगोला मार्केट कमिटी सभापती समाधान पाटील, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरुण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गिरीश भाई गंगथडे, रमेश पवार, विकास इंगोले, गणेश शिनगारे, अण्णासाहेब पवार, वैभव केदार, अरविंद केदार, पिंटू पाटील, किरण पवार इत्यादी उपस्थित होते.