वारकऱ्यांवर काळाचा घाला, सात वारकरी ठार
सांगोला (तालुका प्रतिनिधी): विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या जठारवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर येथील वारकर्यांवर काळाने घाला घातल्याची दुर्देवी घटना घडली आहे. कार्तिकी वारीसाठी पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत चारचाकी कार घुसल्याने माय-लेकरासह सात वारकरी भाविक ठार झाल्याची घटना सोमवार ३१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ घडली. मृतात पाच महिला, एका पुरुषांसह एका १४ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तसेच पाचजण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
अपघाताची माहिती मिळताच पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, स.पो.नि. नागेश यमगर, स.पो.नि. हेमंतकुमार काटकर, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी, जठारवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर येथील वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. तर एम.एच. 13 डी.ई. 7938 ही चारचाकी गाडी सांगोल्याकडे निघाली होती. दरम्यान ३१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होत असताना जुनोनी ता. सांगोला गावाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार दिंडीत घुसली. यावेळी चारचाकी गाडी वारकऱ्यांना चिरडत गेली. या भीषण अपघातात जठारवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर येथील चार महिला, तीन पुरुषांसह एका लहान बालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रंजना बळवंत जाधव वय ५५, सर्जेराव श्रीपती जाधव वय ४५, शारदा आनंदा घोडके वय ४०, सुनिता सुभाष काटे वय ५०, शांताबाई जयसिंग जाधव वय ५० सर्वजण रा. जठारवाडी ता. करवीर जि. कोल्हापूर तसेच सुशिला पवार वय ३५, गौरव पवार १४ वय वळीवडे ता. करवीर जि. कोल्हापूर अशी अपघातात मरण पावलेल्या भाविकांची नावे आहेत. या अपघातात अनिता गोपीनाथ जगदाळे वय ६०, अनिता सरदार जाधव ५५, सरिता अरुण सियेकर वय ४५, शानुताई विलास सियेकर वय ३५, सुभाष केशव काटे वय ६७ हे पाच वारकरी गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.